Shabdanjali......शब्दांजली

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९

हुसैनीवाला..अभिमानास्पद क्षण

                                                                 हुसैनीवाला




भारताचे  Food bowl  किंवा Wheat  bowl  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  पंजाब राज्याबद्दल वर्तमानपत्रात वेगवेगळ्या बातम्या आपण वाचत असतो. सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम या हिमालयातून उगम पावलेल्या बारमाही वाहणार्या पाच नद्यांमुळे याचं नाव पंजाब असं पडलं. या पाण्याने संपन्न झालेल्या या सुपीक प्रदेशात कृषी हा मुख्य व्यवसाय आहे.   दुर्दैवाने पाकीस्तानला लागून असलेल्या या राज्याला सध्या अंमली पदार्थाच्या सीमेपलीकडच्या स्मगलींगने, व्यसनाने ग्रासून टाकलंय. इथली तरुण पिढी या व्यसनांच्या आहारी चाललीये हे वाचून या शुर वीरांच्या भुमीची, तरुण  दिलदार लोकांच्या भविष्याची काळजी वाटते. या राज्याच्या तीन सीमा पाकीस्तानला लागून आहेत.

आज मात्र मी पंजाबच्या हुसैनीवालाबद्दल लिहीणार आहे. राष्ट्रीय शहीद स्मारक असलेले हे ठिकाण प्रेरणादायी आहेच पण माझ्या मते प्रत्येक भारतीयाने, मराठी माणसाने नतमस्तक व्हावं असं पवित्र तिर्थक्षेत्र आहे. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने अशा स्थळांना भेट द्यायला हवी.
पंजाबमधे वाघा , फाजिल्का आणि हुसैनीवाला या तीन सीमारेषा पाकीस्तानला लागून आहेत. या तीनही ठिकाणी जाण्याची संधी मला मिळाली. वाघा ही एकमेव सीमारेषा आहे जी ग्रँड ट्रंकरोडवर स्थित आहे. ह्या रस्त्याला सिल्क रोड असं म्हणलं जातं. जुन्या काळातही अफगाणीस्तानला जाण्यासाठी ह्या रस्त्याचा  वापर केला जात असे. इथूनच रस्त्याच्या मार्गे आजही पाकीस्तानला येजा करता येते. खूप प्रसिध्द झालेल्या इथल्या संचलनामधे हमरस्त्याच्या दोन्ही बाजूला बसून प्रेक्षक लांबून संचलन बघु शकतात. हुसैनीवालामधे मात्र ती आपण खूप जवळून बघु शकतो.
पीरबाबा गुलाम हुसैनीवाला यांच्यावरुन नाव पडलेले हुसैनीवाला हे गाव फिरोजपुर जिल्ह्यात आहे. फाळणीच्या वेळी हा भाग पाकीस्तानच्या हद्दीत गेला. परंतु भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांची समाधी इथे असल्याने भारत सरकारने १९७१ साली फाजील्का येथील बारा गावांच्या बदल्यात हा भाग मिळवला.   या जागेवर या देशभक्तांचं व नंतर झालेल्या युध्दांमधे शहीद झालेल्या वीरांसाठी राष्ट्रीय शहीद स्मारकाची उभारणी केली.  राजगुरु या मराठी देशभक्ताचे नाव  या स्मारकावर वाचून , ते ही पंजाबमधे, अभिमान वाटला. हे ठिकाण प्रत्येक येणाऱ्या माणसासाठी स्फुर्तीस्थान बनलं आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना लाहोर येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. तिघांना फाशी देण्याची तारीख ब्रिटीश सरकारने जाहीर केली होती. पण लोकांमधला वाढता असंतोष पाहून जाहीर केलेल्या तारखेआधीच त्यांना फाशी देण्यात आली. त्यांच्या पार्थीवांवर याच ठिकाणी अग्नीसंस्कार करण्यात आले. या ठिकाणी प्रवेश केला की जणु काही इथल्या हवेतच देशभक्ती भरुन राहील्यासारखं वाटतं. इतक्या लहान वयात या तिघांनी केलेलं बलीदान पाहून उर भरुन येतो.  इथेच त्यावेळचे पहिले रेल्वे स्टेशनही आहे. ही जागा१९७१ च्या युध्दात पाकीस्तानने उध्वस्त केली होती. त्यावेळी मराठा बटालीयनने निकराचा लढा दिला, बरेच मराठी वीर शहीद झाले. नंतर भारत सरकारने अतिशय सुंदर राष्ट्रीय स्मारक येथे बनवले आहे.
दररोज सूर्यास्ताच्या वेळी दोन्ही देशांचा झेंडा ध्वजसंचलन करुन समारंभपूर्वक उतरवण्यात येतो. हे पाहणं हा अत्यंत प्रेरणादायक अनुभव आहे. एखादे छोटेसे स्टेडियम असते तशी या जागेची रचना आहे. अर्ध्या भागात भारताचे तर दुसऱ्या भागात पाकीस्तानचे प्रेक्षक बसू शकतात. खूप जवळून दोघेही  जण एकमेकांना पाहू शकतात. पाकीस्तानकडील भागाला गेंडावाला असं नाव आहे. ध्वजसंचलन चालू असताना दोन्ही बाजुंनी जोरजोरात घोषणा देणं चालू असतं, झेंडे फडकत असतात.आपल्या बाजूने वंदे मातरम, बोले सौनिहाल सत श्री अकाल,भारत माता की जय तर पाकीस्तानकडे जी ले जीले पाकीस्तान असे नारे जोरजोरात चालू असतात. या घोषणांमधे आपण कधी सामील होतो ते आपल्यालाही कळत नाही. ते वातावरणच जादुई, जोशपूर्ण असतं.मोबाइलचे कॕमेरे लखलखत असतात.  आपले सैनिक संचलन करतात तेव्हा भारताचे लोक आणि त्यांचे सैनिक संचलन करतात तेव्हा त्यांचे लोक ओरडून प्रोत्साहन देत असतात, तेव्हा त्यांच्यातील ओरडण्याच्या स्पर्धेने वातावरण दुमदुमुन जाते, अक्षरशः शेजारी कोण काय बोलतं ते ऐकायलाही येत नाही.  आपले सैनिक खाकी वर्दीमधे पाय खांद्यापर्यंत  उंच नेउन  संचलन करतात तेव्हा त्यांना सलाम करावासा वाटतो. दोन्हीकडचे लोक सैनिकांचे, एकमेकांचे फोटो काढत असतात. विरोधी घोषणा दिल्या तरी ते कसे दिसतात, त्यांनी काय घातलंय याची उत्सुकता दोन्ही बाजूंना असते. ध्वजसंचलन संपल्यावरही एकमेकांकडे पहात पहात लोक बाहेर पडतात.
बाहेर पडताना बंकरमधे सैनिक सावधानतेत बसलेले दिसतात. त्यांना सतत सावध रहायला लागतं. बेसावध असताना एकदा पाकीस्तानने हल्ला करुन मालमत्तेचं  बरंच नुकसान व मनुष्यहानी  केलेली असल्याने  त्यांना सतत सावध रहायला लागतं, अगदी डोळ्यात तेल घालून. विशीष्ठ प्रकारे शिकवलेले  लॕब्रेडोर जातीचे कुत्रेही दोन्ही बाजूने उभे असतात. हे सगळं पाहून भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.
प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा तरी या ध्वजसंचलनाचा अनुभव घ्यायला हवा.  भारतमातेच्या सुपुत्रांचे हे स्मारक आहे...पवित्र तिर्थस्थळ  आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा