Shabdanjali......शब्दांजली

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

जीवलग सख्यांना पत्र

प्रिय प्रिय अपर्णा, जोशीभाभी आणि गांजापुरे वहिनी ,

आश्चर्य वाटलं ना पत्र पाहून ? कितीतरी वर्षांनंतर संवाद साधतीये तुमच्याशी. मला वाटतं१५/२० वर्षं झाली असतील आपल्याला भेटून.  आपल्यातलं भौगोलीक अंतर वाढलं असलं ना तरी मनातून मात्र मी तुमच्या खूप जवळ आहे. तुम्हा तिघींना मी कधीच विसरु शकणार नाही. तुम्ही जे माझ्यासाठी केलंय ना ते फक्त जवळची व्यक्तीच करु शकते. आज माझ्या मनातल्या भावना तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी तुम्हाला पत्र लिहायचं ठरवलं.
मला आठवतंय माझ्या मुलाचा जन्म झाला  आणि माझ्या पतीची मध्य प्रदेशमधे कोरबा या ठिकाणी बदली झाली. तीन महिन्याच्या सचिनला घेउन थोड्याशा तणावातच मी कोरब्याला गेले. लहान बाळ, पुण्याबाहेर प्रथमच बाहेर पडलेली मी, हिंदी भाषा देखील नीट बोलता न येणे व स्वयंपाकाची  नसलेली सवय ह्या सर्वासोबत मी तिथल्या काॕलनीत घाबरतच प्रवेश केला. माझं कसं होणार याची मला व घरच्यांना काळजी लागली होती. पण तुम्ही तिघींनी मनापासून माझं स्वागत केलंत. तुम्ही दोघी मराठी आणि जोशीभाभी गुजराथी, तिघींनी मला खूप सांभाळून घेतलंत, मला मदत केलीत, माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी बनून गेलात. माझ्यावर कोसळलेल्या कठीण प्रसंगात माझ्या पाठीशी पहाडासारख्या उभ्या राहीलात.
तो दिवस मी आजही विसरु शकत नाही. मी, माझ्या मांडीवर ६ महिन्यांचा सचिन आणि माझे पती आमच्या स्कुटरवरुन एका वाढदिवसाच्या पार्टीहून परत येत होतो. रात्रीची वेळ होती. रस्त्यात अंधार होता. एक गाडी मागून जोरात आली आणि स्कुटरला उडवून निघून गेली.  शेजारुन कॕनाल वाहत होता. नशीबाने त्याच्या बाजूला आम्ही पडलो. आश्चर्य  म्हणजे सचिनच्या अंगावर ओरखडाही उठला नाही. पतीलाही फारसं काही लागलं नाही. पण माझं डोकं रस्त्यावर आपटलं, मी बेशुद्ध पडले. मागून आमच्या कंपनीची गाडी येत होती. सगळ्यांनी मिळून मला हाॕस्पीटलमधे अॕडमिट केलं. माझ्या डोक्याला ८ टाके पडले. मला ५ दिवस तिथे रहावं लागलं. पण जनरल वाॕर्डच तिथे उपलब्ध होता. रात्री सोबतीला जो कोणी येईल त्याला खाली झोपावे लागणार होते. पण पाचही दिवस तुम्ही तिघी आळीपाळीने येउन खाली झोपत होतात. सचिन फक्त सहा महिन्याचा होता. त्याला हाॕस्पीटलमधे दिवसभर कसे ठेवणार म्हणून तुम्ही तिघी त्याला दिवसभर सांभाळायचात आणि रात्री माझ्याकडे घेउन यायचात. सकाळी परत जाताना त्याला घेउन जायचात, खरंच हे सगळं मी कसं विसरु? इतक्या छोट्या मुलाला आई नसताना सांभाळणं किती अवघड गेलं असेल तुम्हांला पण तुम्ही त्याचा कधी उच्चारही केला नाहीत. महाराष्ट्राबाहेर, आपल्या माणसांपासून दूर असतानाही घरच्यांपेक्षाही जास्त जवळची माणसं, मैत्रीणी मला मिळाल्या. माझ्यासारखी भाग्यवान मीच, यासाठी देवाचे कितीही आभार मानले  तरी ते कमीच आहेत. मी घरी आल्यावरही १५ दिवस मला स्वयंपाक करु दिला नाहीत तुम्ही. कुठुन आणलंत एवढं मोठ्ठं मन? ह्या सगळ्यासाठी तुमचे आभार मानणं चुकीचंच ठरेल, म्हणूनच तुमच्या रुणात राहणंच मला आवडेल.
या घटनेला इतकी वर्ष झाली तरी एकएक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आजही जसाच्या तसा उभा राहतो. आज या पत्राच्या निमीत्ताने माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचवायची संधी मला मिळालीये. तुम्हा तिघींना मी कधीच विसरु शकणार नाही.  बाकी काय लिहू.
तुम्हा तिघींना दीर्घायुष्य मिळो, आनंदाने तुमचं आयुष्य भरुन जावो याच माझ्या मनापासून शुभेच्छा .

तुमची मैत्रीण ,

अंजली.


गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

सुहाना सफर और ये मौसम हंसी

सुहाना सफर और ये मौसम हंसी🌧🦋🌲☘

पावसाळी वातावरण , वळणावळणाचा डोंगरांमधून जाणारा अरुंद रस्ता,  एकीकडे उंच पहाड तर दुसरीकडे खोल दरी, दरीत उतरलेले ढग, ढगांच्याही वरुन चाललेली आमची गाडी,दरीतून वरपर्यंत आलेले देवदार वृक्ष , जागा मिळेल तिथे वाढलेली हिरवाई, बारीक बारीक येणारा पाउस आणि गाडीच्या आवाजाखेरीज पसरलेली निःशब्द    शांतता. एखाद्या चित्रपटातील  प्रसंग   वाटतोय ना ? मग पूर्णपणे चुकलात. डलहौसी , खज्जियार ते धर्मशाला या प्रवासात मला आलेला हा अवर्णनीय अनुभव .इतका सुंदर, शुध्द निसर्ग या आधी मी अनुभवलेला नाही.

 हिमाचल प्रदेशला ' देवभुमी ' असं  संबोधलं  जातं. संपूर्ण पहाडांनी भरलेल्या या प्रदेशात पर्यटन हा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे इतक्या उंच पहाडांमधेही रस्ते बनवले गेले आहेत. समुद्रसपाटीपासून २००० मिटर उंचीवरून आम्ही प्रवास केला.  तेव्हा या रस्त्यावर खूप अवघड वळणे होती .एरवी अशा रस्त्तयांवर मला खूप त्रास होतो पण  आजुबाजुचा रमणीय परीसर पाहून  भिती किंवा त्रास मी विसरुनच गेले. निसर्गाची ही मुक्त उधळण पाहण्यासाठी  गाडीच्या काचा आम्ही खाली केल्या. खोल श्वास घेउन ती शुद्ध हवा आम्ही छातीत भरुन घेत होतो. सुरवातीला मला किती फोटो काढु आणि किती नाही असं झालं होतं पण मग मात्र मोबाईल आत ठेवून दिला आणि चित्रात असल्यासारख्या निसर्गाचा आस्वाद घेउ लागले.एकामागून एक असे किती पहाड ओलांडले ते आम्हाला समजलंच नाही. लांबून दरीच्या पलीकडील पहाडावरचा रस्ता, त्यावरची वाहने खूप छोटी दिसायची. थोड्या वेळाने पहावं तर आम्हीच त्या रस्त्यावर पोहचायचो. आमच्या    चालक   दादाच्या कौशल्याची मात्र परीक्षाच पाहीली या रस्त्याने. त्या वळणावळणांमुळे त्याला चक्कर येतीये की काय असं वाटायला लागलं. वाटेत चुवाडी, ज्योत, नुरपुर, मनकोट अशी गावं लागत होती. अधूनमधून तुरळक मनुष्यवस्ती इतक्या उंचीवरही दिसत होती.  एके    ठिकाणी चहा प्यायला थांबलो. त्या दुकानदाराचा ( सुभाष ) मुलगा रोज ६ किमी  खाली असलेल्या शाळेत जातो ते सुध्दा बसने, शाळेच्या नाही तर गावागावांमधून जाणार्या सरकारी बसने. बससेवा त्या उंचीवरही चालू आहे आणि मुलंही विनातक्रार इतक्या लांब शाळेत जातात यावरुन   काही वेळातच तिथल्या संघर्षमय जीवनाची प्रचिती आली. रस्त्यात अनेक ठिकाणी धबधबेही दिसत होते. आपण असे धबधबे पहायला आवर्जून , मुद्दाम एखाद्या ठिकाणी जातो, पण इकडे या लोकांना हे रोजचंच असल्याने त्याचं काहीच अप्रुप नाहीये. मधेच एका ठिकाणी आम्हाला गरमागरम कणसं, काकडी, सफरचंद चाट अगदी नाममात्र किंमतीत मिळालं. इतक्या उंचीवर येउन  व्यवसाय करणाऱ्या  या लोकांचं खूप कौतुक वाटलं. हे सगळं आल्हाददायक वातावरण पाहून इथेच डोळे बंद करुन स्तब्ध उभं रहावं असं वाटत होतं. या   निसर्गापुढे  आपण किती क्षुद्र आहोत याची जाणीवही वारंवार होत होती. या पूर्ण  प्रवासात एक गाणं सारखं गुणगुणावसं वाटत होतं
                           'सुहाना सफर और ये मौसम हंसी, हमें डर है हम खो ना जाये कहीं'


या दरम्यान डलहौसी, खज्जियार, धर्मशाला अशी पर्यटन स्थळं आम्ही पाहीली. खज्जियारला तर भारतातलं स्विजर्लंड म्हणून ओळखलं जातं. लांबच्या लांब पसरलेली गवताची कुरणं, मधे तलाव, आजूबाजूला असलेले देवदारचे वृक्ष , त्यात  चरणार्या  मेंढ्या आणि खालपर्यंत आलेले ढग. केवळ अप्रतिम ,अवर्णनीय  दृश्य  होतं ते. निसर्गाने  मुक्त हस्ताने रंगांची उधळण केलीये जणु.
इथल्या 'थुपका' नावाच्या पाककृतीची चवही पाहीली, खूपच चांगली लागते.

 ही सर्व पर्यटन स्थळं  वर्णनातीत , अतिशय सुंदर  आहेतच   पण तरीही खूप गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे नाहीतर भविष्यात ही सगळी संपत्ती आपण गमावून बसू की काय याची भिती वाटते. सगळीकडे   उपहारगृहांची गर्दी झालीये. अरुंद रस्ते, बेसुमार गाड्या, रहदारीचा खोळंबा, सर्वत्र पसरलेला कचरा, बाजारात असलेली अस्वच्छता, दुकानांची बेशुमार गर्दी, निसर्गाच्या कुशीत असूनही पाण्याची कमतरता यामधे त्या स्थळांचं मुळ सौंदर्य हरवत चाललंय की काय असं वाटतं. यामधे पर्यटक म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहीजेच पण त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाने आत्ताच  काळजी घ्यायला हवी अन्यथा या निसर्गाने दिलेल्या दानाला मुकण्यास वेळ लागणार नाही.





















बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

पावसाला पत्र

प्रिय वरुण,
माझा सर्वात जवळचा मित्र आहेस तु.  आज ' मैत्रीदिन '. मग तुझी आठवण झाल्याशिवाय, तुझ्याशी बोलल्याशिवाय हा दिवस कसा साजरा होणार?  दहावीपर्यंत मुलींच्या शाळेत जात असल्याने 'मित्र' हा शब्दही उच्चारायची बंदी होती. मग कळायला लागल्यापासून मनातल्या मनात तुझ्याशी मैत्रीचं नातं जोडून टाकलं.

दर वर्षी भेटायला येतोस तु. मला आठवतंय सुरवाती सुरवातीला तर बरोब्बर ७ जून ला तु येणार म्हणजे येणारच. कधीच तारीख चुकवली नाहीस. पण आताशा फारच बेभरवशाचा झाला आहेस. तारीख तर चुकवतोसच पण  खूप वाट पहायला लावतोस, कधी येतच नाहीस तर कधी खूप जास्त येतोस. काय झालंय तुला? का असं वागतो आहेस? खरं सांगू का मी खूप नाराज आहे तुझ्यावर.  मग म्हणलं तुला पत्रं लिहून नाराजी कळवावी. म्हणून हा पत्रप्रपंच.
तुझं आधीचं येणं मला आठवतंय. लहान होते तेव्हा मी. तु यायच्या आधीचं वातावरण खू आवडायचं मला, अजूनही आवडतं.माझ्या घराला ना मोठी गॕलरी होती.त्या गॕलरीत उभं राहून तुझं कोसळणं बघायला मजा यायची. लोकांची धावपळ, त्यांच्या छत्र्या, रेनकोट हे सगळं स्वतः न भिजता पहायला काय धमाल यायची. रस्त्यावरून छोटे छोटे ओहोळ वहायला लागायचे. आम्ही कागदाच्या नावा करुन त्यात सोडायचो  आणि पळत पळत गॕलरीत येउन नाव कुठपर्यंत गेलीये हे पाहत बसायचो. खरंच तुझ्या येण्याने खूप आनंद दिलाहेस तु आम्हाला कायमच. मग आताच काय झालंय तुला? आत्ताआत्तापर्यंत जूनमधे यायचा शिरस्ता कधीच मोडला नाहीस. आता तर जून  उलटून जुलैचा मध्य आला तरी तुझी चातकासारखी वाट पहावी लागते. मला माहीतीये तुझं उत्तर .याला कारण आम्हीच आहोत, हो ना? खरंच आहे रे मित्रा, कबूलच करते मी.तुझं पाणी ज्या नदीत मिसळतं ना  त्याचं पात्रंच कमी करुन टाकलंय आम्ही इमारतींसाठी, समुद्र हटवून बाँधकामं करतोय, जंगलच्या जंगल उध्वस्तं करतोय, पर्यावरणाचा ह्रास होतोय, डोंगर फोडतोय, पाणी अडवत नाहीये, पाण्याचा अपव्यय चाललाय, हे सगळं पाहून खूप मनस्ताप होतो तुला आणि मग संतापून तु एकतर येतच नाहीस किंवा खूप जास्त वेळा येतोस, बरोबर म्हणतीये ना मी? पण आम्हांला आता हे समजायला लागलंय. तुझा राग काढण्याचा खूप प्रयत्न करतोय आम्ही, बघतोयस ना? वृक्षारोपण करतोय, पाणी अडवतोय, जिरवतोय, पर्यावरण वाचवायचा प्रयत्न करतोय. आता तरी राग सोड ना रे. माझा जवळचा मित्र रागावला तर मलाआवडेल का सांग बरं? तुझ्या रागामुळे सर्वांचं किती नुकसान होतंय कळतंय का तुला? तु आला नाहीस तर दुष्काळ . माणसं, गुरंढोरं पटापट मरताहेत, शेतकरी बिचारे आत्महत्या करताहेत, जास्तं वेळा आलास तर जित्राबं वाहून चाललीयेत, माणसं, घरंदारं पुरात बुडताहेत, रोगराई पसरलीये. किती अंत पाहणारेस. आता तरी राग सोड . आम्ही या चुका परत करणार नाही, promise करते तुला. आम्ही सगळे तुझी मनापासून माफी मागतो. करशील ना माफ?

 आज मैत्रीदिनाच्या निमीत्ताने हक्काने तुझ्याकडे मागणं मागते जवळची मैत्रीण म्हणून, नाही म्हणू नकोस. आता नेहमीसारखा राग सोडून नियमीत भेटायला  येत जा...७ जूनला.चालेल?

तुझीच मैत्रीण ,
अंजली.

सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

आई होताना

आज मातृ दिन. माझ्या  आईचा त्याग, तिचे आमच्यावरील प्रेम,त्यासाठी तिने घेतलेले अपरिमित कष्ट ,निष्ठा हे कसं विसरता येईल? ज्या काळात स्त्रीयांचं बाहेर पडणंसुध्दा अवघड होतं अशा काळात बाहेर पडून, आयुष्यभर शिक्षीकेची नोकरी करुन एकहाती तिने आम्हा तिघांना वाढवलं. यासाठी तिने जो लढा दिला तो आठवला तरी माझ्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. माझ्या सख्ख्या मावशीने, ताईमावशीने, तिला भक्कम पाठींबा दिला. या दोघींना वंदन केल्याशिवाय मातृदिन पूर्ण होउच शकत नाही.

आई होणं म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म आहे असं म्हणतात.नउ महिने बाळाचा सांभाळ करुन त्याला जन्म देणं हा एक आनंदाचा सोहळा असतो.प्रत्येक गोष्टीसाठी पोटातला तो जीव आईवर अवलंबून असतो.आई खुश तर तो इवलासा  जीवही खुश. म्हणूनच आईची मनःस्थिती खूप महत्वाची असते. या काळात खूप चांगली पुस्तकं वाचावीत असं म्हणतात. त्याचं तंतोतंत पालन मी केलं. एक मुलगा आणि एक मुलगी यांची आई होण्याचं भाग्य मला लाभलं.सचिनच्या वेळी मी शिवाजी महाराजांवरचे ' श्रीमान योगी ' आणि मितालीच्या वेळी 'झाशीची राणी लक्ष्मीबाई ' ही पुस्तके जाणीवपूर्वक वाचली होती. एक प्रकारे गर्भसंस्कारच नाही का?माझे सासरे म्हणूनच सचिनला 'राजे' आणि मितालीला कायम ' लक्ष्मी' अशी हाक मारायचे. दोघांना वाढवणे हा आई म्हणून अनेक अनुभव, आव्हाने आणि समाधान,आनंद  यांचा सुंदर प्रवास होता.
या दोघांना मोठ्ठं करताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. मुलगा व मुलगी यांना वाढवतानाचे अनुभव खूप वेगळे असतात असं मला वाटतं. मुली खूप भावनाशील असताता, त्या व्यक्तही होतात पण त्यांना खूप सांभाळावे लागते. त्यांचे मुड्सही प्रत्येक वेळी वेगळे असतात, दर महिन्याच्या मासिक पाळीच्या वेळी ते बदलत असतात. ते समजून घेउन त्याप्रमाणे त्यांच्याशी वागावे लागते. यामधे आपल्या  चिकाटीचा कस लागतो पण याच मुली मोठ्या झाल्यावर सर्वात जास्त आपल्याला समजून घेतात, प्रेम करतात, काळजी घेतात. मुले भावना व्यक्त करु शकत नाहीत. पण त्या भावना ओळखणे हे आईचेच काम असते. त्यांचे विश्व घराबाहेर मित्रांमधे जास्त असते. याचा अर्थ घरात लक्ष नसते असं नाही. पण ते बोलत नाहीत.  त्यांच्या विश्वाकडे लक्ष ठेवावे लागते . अनेक वेळा ते भरकटतात पण परत रस्यावर येतात. खूप काळजीही घेतात पण मुलींसारखे ते बोलत नाहीत.  त्यांना वाढवताना खूप समंजसपणा, शांतपणा दाखवावा लागतो.

दोघांना वाढवताना माझ्यामधे एक व्यक्ती म्हणून  खूप चांगले बदल झाले. आधीची 'मी' आणि आत्ताची आई झाल्यावरची 'मी ' यात आमुलाग्र बदल झालेला आहे. या दोघांनी मला आई म्हणून आयुष्यातील सर्वात उच्च असा अनुभव दिला आहे. आज या दोघांकडे पाहताना आई म्हणून मला खूप अभिमान वाटतो, समाधान वाटतं,आनंद वाटतो. या दोघांनी जे सुख मला दिलंय त्याची उतराई  मी होउ शकत नाही.. एक व्यक्ती म्हणून माझा पुनर्जन्म झालाय..नक्कीच .

मला वाटतं प्रत्येक आईचे असेच अनुभव असतील, हो ना मैत्रीणींनो?

@ अंजली जोगळेकर.

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

देशासाठी मी काय करु शकते?

पुलवामा येथे आपल्या जवानांवर दहशतवादी हल्ला होऊन ६ दिवस उलटून गेले तरीही मनाची तगमग, कासाविशी, संताप कमी होत नाहीये. असा भ्याड हल्ला करुन , ४० च्यावर जीव घेऊन शेजारी देशाने काय साधले माहीत नाही पण माझ्यासारख्या लाखो सामान्य नागरीकांच्या मनात मात्र अनेक प्रश्न उभे राहीले आहेत. यातील कित्येक शहीद जवानांची वर्ष, दोन वर्षापूर्वी लग्न झाली आहेत, काहींवर त्यांच्या आईवडीलांची जबाबदारी आहे, काहींची मुलं लहान आहेत तर काहींची नुकतीच लग्न झाली आहेत.त्यांच्या कुटुंबांचा आक्रोश बघवत नाहीये.टेलीविजनवर दिसणारी दृश्यं डोळ्यासमोरुन जात नाहीयेत. अशा वेळी एक सामान्य नागरीक म्हणून मी काय करु शकते हा प्रश्न वारंवार मला सतावतोय. या परीस्थितीत प्रत्यक्ष तिथे जाउन तर मी काहीच करु शकत नाही ही हतबलता मला खूप अस्वस्थ करतीये.मग मी नक्की काय करायला हवं? या प्रश्नाचे उत्तर शोधायचा मी प्रयत्न केला आहे.तो मी मांडतीये. तुमच्याकडेही याचे उत्तर असेल तर जरुर सांगा. आपण सर्व जण मिळून या जवानांसाठी, आपल्या देशासाठी काहीतरी करु या. या घडीला नुसता संताप, बडबड नकोय तर कृती हवीये.......आपल्यासारख्या सामान्य नागरीकांकडून.
• शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांसाठी आर्थिक मदत आपण करु शकतो. अक्षयकुमार या सिनेअभिनेत्याच्या कल्पनेतून भारत सरकारने एक वेबसाईट तयार केली आहे. त्याद्वारे जवानांच्या खात्यात तुम्ही थेट रक्कम पाठवू शकता. या साईटचे नाव # bharatkeveer.gov.in असे आहे. कमीतक१०० रुपयेही पाठवू शकता.यामुळे incometax मधेही 80G खाली सुट मिळते. डेबीट कार्डद्वारे पैसे पाठवण्याची यात सोय आहे. Incometax साठी सर्टीफिकेटही लगेच मिळते. फुल ना फुलाच्या पाकळीची मदत करुन कुटुंबियांच्या दुःखावर छोटीशी फुंकर मारु यात.
• प्रत्यक्ष जरी आपण जाउन काही करु शकत नसलो तरी अनेक संस्था जवानांसाठी काम करत असताता, त्यांचे उपक्रम राबवत असतात. या उपक्रमांमधे आपण सहभागी होउ शकतो.  आपल्या परीसरातील संस्थांची माहिती गुगलवर मिळू शकते.
• जखमी झालेले अनेक सैनिक आर्मी हाॕस्पीटलमधे भरती झालेले असतात. त्यांना भेटायला जाउ शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांच्याबरोबर दिवाळी, राखी साजरे करु शकतो, त्यांना काही हवे असल्यास आणून देउ शकतो, गप्पा मारु शकतो, गरज असेल तर काही वाचून दाखवू शकतो.
• याशिवाय आज दहशतवाद आपल्या घराच्या उंबर्यापर्यंत येउन पोचलाय. सर्वांनी सजग राहणे, भाड्याने घर देताना काळजी घेणे, जागरुक राहून काही संशयास्पद आढळल्यास पोलीसांना कळवणे हे करणे गरजेचे आहे. आपले सैनिक युध्दात नाही तर दहशतवादामुळे शहीद झाले आहेत हे पाहीले की त्याचे गांभिर्य लक्षात येईल. एक नागरीक हा एक सैनिक असे झाले तर दहशतवाद्यांना काही करायची संधीच मिळणार नाही.
• सध्या सोशल मिडीयावर अनेक फोटो, बातम्या पहायला मिळतात. त्या बहुतेक करुन चुकीच्या , अतिरंजीत असतात. त्यावर विश्वास ठेवू नका, forward करु नका. त्याची शहानिशा करा. या अफवा पसरवण्यामागे बर्याचवेळा समाजकंटकही असू शकतात. आपण विश्वास ठेवून त्यांना मदत करतोय व indirectly आपल्या सैन्यासमोर संकट उभे करतोय कारण सिमेवरचा जवान एकसंध भारतासाठी लढतोय, जातपात, धर्म यासाठी आपसात लढणार्या लोकांसाठी नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
• आज अनेक चॕनल्सवर ‘experts’ ना बोलवून चर्चा चाललेली दिसते. पण अशा वेळी सरकारच्या मागे ठामपणे उभे राहणे व संयम बाळगणे हे सामान्य नागरीक म्हणून आपले कर्तव्य आहे.
• आपल्या आसपास कार्यरत असलेल्या सैनिकांचे कुटुंबिय रहात असेल तर त्यांना मदत करायला पाहीजे . त्याची गरज नसेल तर respect करणे, जाणीव ठेवणे की या घरातला माणूस आपल्यासाठी लढतोय हे तर आपण नक्कीच करु शकतो.
• मला असं वाटतं की सर्वोच्च मान हा जवानांना मिळाला पाहीजे. जसं एखादा सैनिक दिसला की उभे राहून मान देणे, सुट्टीवर आलेल्या सैनिकाँची काही सरकारी कामे असतील तर ती लाईनमधे उभे रहायला न लागता preference देउन ती कामे करणे किंवा परदेशात असतं तसं विमानातून जर प्रवास करत असतील तर ते जाहीर करुन टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करणे यासारख्या गोष्टी आपण करायला हव्यात.
• एक नागरीक म्हणून असलेली आपली कर्तव्य पार पाडून आपण एकप्रकारे देशसेवाच करणार आहोत.

चला तर मग सगळेजण मिळून या संकटाचा सामना करु.एकजुट होऊ या, जबाबदार नागरीक बनून,जातपात धर्म यांच्या भिंती तोडून, सगळे नियम पाळून , एकमेकांवर , देशावर, सैनिकांवर प्रेम दाखवू या ,  आदर करु या. आता वेळ आहे कृतीची ...एका सामान्य नागरीकाकडून

@अंजली जोगळेकर.


रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

मैत्री दिन

मैत्री दिन

आज मैत्री दिन. या दिवसाची संधी साधून जरा मैत्रिणींबद्ल लिहू असं ठरवलं.  लहानपणापासून बघायला गेलं तर शाळेत फारशा मैत्रीणी मला नव्हत्या. पुढे काॕलेजमधे प्रवेश घेतल्यावरही ३/४ मैत्रीणींपुढे काही माझी गाडी गेली नाही. लग्न झाल्यावर मात्र ही परीस्थिती बदलली. दोन्ही मुलांच्या शाळेच्या निमीत्ताने पालक असलेल्या आम्ही आया मैत्रीणी झालो. मोठ्या मुलाच्या वेळी झालेली मैत्री स्थिरावेपर्यंत मुलीच्या शाळा प्रवेशाची वेळ झाली. माझ्या मैत्रीणींच्या संख्येत वाढ व्हायला मग अजिबात वेळ लागला नाही. हळूहळू संसारात स्थिरावल्यावर मुलांच्या पलीकडे माझं क्षितीज विस्तारायला  लागलं,नवनवीन ओळखी होउ लागल्या आणि मग वय हा मुद्दा मैत्रीसाठी गौण ठरायला लागला. माझ्यापेक्षा खूप लहान/ मोठ्या अगदी आज्यासुध्दा माझ्या सख्यांच्या यादीत भर घालू लागल्या. बघता बघता माझ्या मैत्रीचा परीघ विस्तारत गेला. या मैत्रीणींनी मला खूप काही दिले. खूप मैत्रीणी असणारी मी म्हणूनच गर्भश्रीमंत आहे.

 त्यांच्याबरोबर थोडासा वेळ जरी घालवला तर एकदम ताजंतवानं वाटायला लागतं.  एकत्र जमून कुठल्याही विषयावर बोलून खळखळून हसलं ना की सगळे ताणतणाव दूर होतात. मनसोक्त गप्पा मारल्या की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. मैत्रीणींसोबत थोडं बाहेर फिरून आलं की पुढील काही दिवसांसाठी नवा उत्साह मिळतो. अडीअडचणींचा सामना करायला बळ मिळतं. यातल्या प्रत्येक जणींकडून काहीनाकाही शिकण्यासारखं आहे. सुंदर लिहीणार्या, सदैव मदतीस तयार असणार्या, सुगरण, व्यवस्थित, कलात्मक, दिलदार, दुसर्याचे भरभरुन कौतुक करणार्या, हसतमुख, आनंदी, सकारात्मक, धीट, धाडसी,अष्टपैलू, साध्या असे  विवीध पैलू असणाऱ्या या माझ्या मैत्रीणींसाठी माझ्या हृदयात एक खास जागा आहे, ध्रुवासारखी अटळ. यांनी माझं आयुष्य खूप आनंददायी, सकारात्मक बनवायला मला मदत केलीये. आज आम्हा सगळ्यांची मैत्री लोणच्यासारखी छान मुरलीये, चवीष्ट झालीये. त्याचा आनंद  आम्ही घेतोय. एक व्यक्ती म्हणून वाटचाल करताना, समृद्ध होताना  त्यांचं स्थान अनमोल आहे. त्यांच्या शिवाय आयुष्य साजरं होउच शकत नाही. या सगळ्या माझ्या खास मैत्रीणींना #मैत्रीदिनाच्या खास शुभेच्छा .