Shabdanjali......शब्दांजली

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

सुहाना सफर और ये मौसम हंसी

सुहाना सफर और ये मौसम हंसी🌧🦋🌲☘

पावसाळी वातावरण , वळणावळणाचा डोंगरांमधून जाणारा अरुंद रस्ता,  एकीकडे उंच पहाड तर दुसरीकडे खोल दरी, दरीत उतरलेले ढग, ढगांच्याही वरुन चाललेली आमची गाडी,दरीतून वरपर्यंत आलेले देवदार वृक्ष , जागा मिळेल तिथे वाढलेली हिरवाई, बारीक बारीक येणारा पाउस आणि गाडीच्या आवाजाखेरीज पसरलेली निःशब्द    शांतता. एखाद्या चित्रपटातील  प्रसंग   वाटतोय ना ? मग पूर्णपणे चुकलात. डलहौसी , खज्जियार ते धर्मशाला या प्रवासात मला आलेला हा अवर्णनीय अनुभव .इतका सुंदर, शुध्द निसर्ग या आधी मी अनुभवलेला नाही.

 हिमाचल प्रदेशला ' देवभुमी ' असं  संबोधलं  जातं. संपूर्ण पहाडांनी भरलेल्या या प्रदेशात पर्यटन हा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे इतक्या उंच पहाडांमधेही रस्ते बनवले गेले आहेत. समुद्रसपाटीपासून २००० मिटर उंचीवरून आम्ही प्रवास केला.  तेव्हा या रस्त्यावर खूप अवघड वळणे होती .एरवी अशा रस्त्तयांवर मला खूप त्रास होतो पण  आजुबाजुचा रमणीय परीसर पाहून  भिती किंवा त्रास मी विसरुनच गेले. निसर्गाची ही मुक्त उधळण पाहण्यासाठी  गाडीच्या काचा आम्ही खाली केल्या. खोल श्वास घेउन ती शुद्ध हवा आम्ही छातीत भरुन घेत होतो. सुरवातीला मला किती फोटो काढु आणि किती नाही असं झालं होतं पण मग मात्र मोबाईल आत ठेवून दिला आणि चित्रात असल्यासारख्या निसर्गाचा आस्वाद घेउ लागले.एकामागून एक असे किती पहाड ओलांडले ते आम्हाला समजलंच नाही. लांबून दरीच्या पलीकडील पहाडावरचा रस्ता, त्यावरची वाहने खूप छोटी दिसायची. थोड्या वेळाने पहावं तर आम्हीच त्या रस्त्यावर पोहचायचो. आमच्या    चालक   दादाच्या कौशल्याची मात्र परीक्षाच पाहीली या रस्त्याने. त्या वळणावळणांमुळे त्याला चक्कर येतीये की काय असं वाटायला लागलं. वाटेत चुवाडी, ज्योत, नुरपुर, मनकोट अशी गावं लागत होती. अधूनमधून तुरळक मनुष्यवस्ती इतक्या उंचीवरही दिसत होती.  एके    ठिकाणी चहा प्यायला थांबलो. त्या दुकानदाराचा ( सुभाष ) मुलगा रोज ६ किमी  खाली असलेल्या शाळेत जातो ते सुध्दा बसने, शाळेच्या नाही तर गावागावांमधून जाणार्या सरकारी बसने. बससेवा त्या उंचीवरही चालू आहे आणि मुलंही विनातक्रार इतक्या लांब शाळेत जातात यावरुन   काही वेळातच तिथल्या संघर्षमय जीवनाची प्रचिती आली. रस्त्यात अनेक ठिकाणी धबधबेही दिसत होते. आपण असे धबधबे पहायला आवर्जून , मुद्दाम एखाद्या ठिकाणी जातो, पण इकडे या लोकांना हे रोजचंच असल्याने त्याचं काहीच अप्रुप नाहीये. मधेच एका ठिकाणी आम्हाला गरमागरम कणसं, काकडी, सफरचंद चाट अगदी नाममात्र किंमतीत मिळालं. इतक्या उंचीवर येउन  व्यवसाय करणाऱ्या  या लोकांचं खूप कौतुक वाटलं. हे सगळं आल्हाददायक वातावरण पाहून इथेच डोळे बंद करुन स्तब्ध उभं रहावं असं वाटत होतं. या   निसर्गापुढे  आपण किती क्षुद्र आहोत याची जाणीवही वारंवार होत होती. या पूर्ण  प्रवासात एक गाणं सारखं गुणगुणावसं वाटत होतं
                           'सुहाना सफर और ये मौसम हंसी, हमें डर है हम खो ना जाये कहीं'


या दरम्यान डलहौसी, खज्जियार, धर्मशाला अशी पर्यटन स्थळं आम्ही पाहीली. खज्जियारला तर भारतातलं स्विजर्लंड म्हणून ओळखलं जातं. लांबच्या लांब पसरलेली गवताची कुरणं, मधे तलाव, आजूबाजूला असलेले देवदारचे वृक्ष , त्यात  चरणार्या  मेंढ्या आणि खालपर्यंत आलेले ढग. केवळ अप्रतिम ,अवर्णनीय  दृश्य  होतं ते. निसर्गाने  मुक्त हस्ताने रंगांची उधळण केलीये जणु.
इथल्या 'थुपका' नावाच्या पाककृतीची चवही पाहीली, खूपच चांगली लागते.

 ही सर्व पर्यटन स्थळं  वर्णनातीत , अतिशय सुंदर  आहेतच   पण तरीही खूप गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे नाहीतर भविष्यात ही सगळी संपत्ती आपण गमावून बसू की काय याची भिती वाटते. सगळीकडे   उपहारगृहांची गर्दी झालीये. अरुंद रस्ते, बेसुमार गाड्या, रहदारीचा खोळंबा, सर्वत्र पसरलेला कचरा, बाजारात असलेली अस्वच्छता, दुकानांची बेशुमार गर्दी, निसर्गाच्या कुशीत असूनही पाण्याची कमतरता यामधे त्या स्थळांचं मुळ सौंदर्य हरवत चाललंय की काय असं वाटतं. यामधे पर्यटक म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहीजेच पण त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाने आत्ताच  काळजी घ्यायला हवी अन्यथा या निसर्गाने दिलेल्या दानाला मुकण्यास वेळ लागणार नाही.





















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा