Shabdanjali......शब्दांजली

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

जीवलग सख्यांना पत्र

प्रिय प्रिय अपर्णा, जोशीभाभी आणि गांजापुरे वहिनी ,

आश्चर्य वाटलं ना पत्र पाहून ? कितीतरी वर्षांनंतर संवाद साधतीये तुमच्याशी. मला वाटतं१५/२० वर्षं झाली असतील आपल्याला भेटून.  आपल्यातलं भौगोलीक अंतर वाढलं असलं ना तरी मनातून मात्र मी तुमच्या खूप जवळ आहे. तुम्हा तिघींना मी कधीच विसरु शकणार नाही. तुम्ही जे माझ्यासाठी केलंय ना ते फक्त जवळची व्यक्तीच करु शकते. आज माझ्या मनातल्या भावना तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी तुम्हाला पत्र लिहायचं ठरवलं.
मला आठवतंय माझ्या मुलाचा जन्म झाला  आणि माझ्या पतीची मध्य प्रदेशमधे कोरबा या ठिकाणी बदली झाली. तीन महिन्याच्या सचिनला घेउन थोड्याशा तणावातच मी कोरब्याला गेले. लहान बाळ, पुण्याबाहेर प्रथमच बाहेर पडलेली मी, हिंदी भाषा देखील नीट बोलता न येणे व स्वयंपाकाची  नसलेली सवय ह्या सर्वासोबत मी तिथल्या काॕलनीत घाबरतच प्रवेश केला. माझं कसं होणार याची मला व घरच्यांना काळजी लागली होती. पण तुम्ही तिघींनी मनापासून माझं स्वागत केलंत. तुम्ही दोघी मराठी आणि जोशीभाभी गुजराथी, तिघींनी मला खूप सांभाळून घेतलंत, मला मदत केलीत, माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी बनून गेलात. माझ्यावर कोसळलेल्या कठीण प्रसंगात माझ्या पाठीशी पहाडासारख्या उभ्या राहीलात.
तो दिवस मी आजही विसरु शकत नाही. मी, माझ्या मांडीवर ६ महिन्यांचा सचिन आणि माझे पती आमच्या स्कुटरवरुन एका वाढदिवसाच्या पार्टीहून परत येत होतो. रात्रीची वेळ होती. रस्त्यात अंधार होता. एक गाडी मागून जोरात आली आणि स्कुटरला उडवून निघून गेली.  शेजारुन कॕनाल वाहत होता. नशीबाने त्याच्या बाजूला आम्ही पडलो. आश्चर्य  म्हणजे सचिनच्या अंगावर ओरखडाही उठला नाही. पतीलाही फारसं काही लागलं नाही. पण माझं डोकं रस्त्यावर आपटलं, मी बेशुद्ध पडले. मागून आमच्या कंपनीची गाडी येत होती. सगळ्यांनी मिळून मला हाॕस्पीटलमधे अॕडमिट केलं. माझ्या डोक्याला ८ टाके पडले. मला ५ दिवस तिथे रहावं लागलं. पण जनरल वाॕर्डच तिथे उपलब्ध होता. रात्री सोबतीला जो कोणी येईल त्याला खाली झोपावे लागणार होते. पण पाचही दिवस तुम्ही तिघी आळीपाळीने येउन खाली झोपत होतात. सचिन फक्त सहा महिन्याचा होता. त्याला हाॕस्पीटलमधे दिवसभर कसे ठेवणार म्हणून तुम्ही तिघी त्याला दिवसभर सांभाळायचात आणि रात्री माझ्याकडे घेउन यायचात. सकाळी परत जाताना त्याला घेउन जायचात, खरंच हे सगळं मी कसं विसरु? इतक्या छोट्या मुलाला आई नसताना सांभाळणं किती अवघड गेलं असेल तुम्हांला पण तुम्ही त्याचा कधी उच्चारही केला नाहीत. महाराष्ट्राबाहेर, आपल्या माणसांपासून दूर असतानाही घरच्यांपेक्षाही जास्त जवळची माणसं, मैत्रीणी मला मिळाल्या. माझ्यासारखी भाग्यवान मीच, यासाठी देवाचे कितीही आभार मानले  तरी ते कमीच आहेत. मी घरी आल्यावरही १५ दिवस मला स्वयंपाक करु दिला नाहीत तुम्ही. कुठुन आणलंत एवढं मोठ्ठं मन? ह्या सगळ्यासाठी तुमचे आभार मानणं चुकीचंच ठरेल, म्हणूनच तुमच्या रुणात राहणंच मला आवडेल.
या घटनेला इतकी वर्ष झाली तरी एकएक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आजही जसाच्या तसा उभा राहतो. आज या पत्राच्या निमीत्ताने माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचवायची संधी मला मिळालीये. तुम्हा तिघींना मी कधीच विसरु शकणार नाही.  बाकी काय लिहू.
तुम्हा तिघींना दीर्घायुष्य मिळो, आनंदाने तुमचं आयुष्य भरुन जावो याच माझ्या मनापासून शुभेच्छा .

तुमची मैत्रीण ,

अंजली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा