Shabdanjali......शब्दांजली

शनिवार, २१ मार्च, २०२०

कोर्टाची पायरी



'शहाण्या माणसाने कोर्टाची आणि पोलीस चौकीची पायरी चढु नये' असं म्हणतात. पण नेमकं या दोनही ठिकाणी जाण्याची वेळ मी आणि विश्राम ( माझे पती ) दोघांवरही आली. या दोनही ठिकाणांबद्दल खूप नकारात्मकता , टीका मी कायमच ऐकत आलीये. म्हणूनच या दोनही ठिकाणचे अनुभव मला मांडावेसे वाटताहेत.

साधारण २००० सालपासून एका केसच्या संदर्भात त्यानंतर  सतत पंधरा वर्षे आम्हांला न्यायालयात जावे लागले. या काळात न्यायालयाचे कामकाज, निकालाला लागणारा वेळ, मा.न्यायाधीशांच्या, वकीलांच्या कामाची पध्दत, न्यायालयावरचा ताण हे सर्व जवळून पाहता आले. २००० साली पहिल्यांदा जेव्हा एका प्रकरणाच्या निमीत्ताने न्यायालयात जायची वेळ आमच्यावर आली तेव्हा मनावर प्रचंड  दडपण आले होते. त्या दिवशी मा. न्यायाधीशांसमोर  साक्षीदाराच्या पिंजऱ्यात  नव्हे कठड्यात 😊 उभे  राहून आपल्याला बोलावं लागणार असा आमचा समज झाला होता. प्रत्यक्षात हा गोड गैरसमज आहे हे थोड्याच वेळात आमच्या लक्षात आले. असं उभं राहून बोलायला तीन वर्ष जावी लागली. पण  प्रथमच न्यायालयात जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा तिथे तीन प्रवेशद्वारे असल्याचे  दिसले. नक्की कुठून प्रवेश करावा  याबद्दल आमचा  गोंधळच उडाला. शेवटी वकीलांना फोन करुन विचारले व त्यांनी सांगीतलेल्या दारातून आत प्रवेश केला. आत शिरता क्षणीच  न्यायालयाचे  खूप मोठे आवार दृष्टीस पडले. कायद्यासारखा रुक्ष विषय हाताळणार्या या विभागात हिरवळ, मोठ्ठाले सावली देणारे वृक्ष पाहून  आम्हालाआश्चर्यच वाटले. माझ्या कल्पनेतलं जे  न्यायालय होतं त्यापेक्षा हे  चित्र खूप वेगळं होतं.  न्यायालयाची इमारत ब्रिटीशकालीन , भव्य व दगडी आहे. माझ्या माहितीप्रमाणे आत चार प्रकारची न्यायालये आहेत,( small cause court, criminal court, district court & civil court).  एकदा आपलं प्रकरण न्यायालयात  दाखल झालं   की ते कुठल्या प्रकारचं आहे ते पाहून त्या त्या न्यायालयात व वेगवेगळ्या  मा.न्यायाधीशांकडे वर्ग केलं जातं. एखाद्या महाविद्यालयात जसे वर्ग असतात तशाच खोल्या या दुमजली इमारतीत आहेत. प्रत्येक खोली म्हणजे एक न्यायालय. बाहेरच्या बाजूला बोर्डवर तेथील मा. न्यायाधीशांचे नाव लिहीलेले असते त्यामुळे पक्षकारांना आपले न्यायालय शोधणे सोपे होते. या खोल्यांच्या म्हणजेच न्यायालयाच्या  आतल्या बाजूला थोडं उंचावर मा.न्यायाधीशांची बसण्याची जागा असते , एका बाजूला  संगणकावर असणारा एक लिपीक व दुसर्या बाजूला भाउसाहेब . भाउसाहेब म्हणजे न्यायालयात दाखल होणार्या सर्व प्रकरणांचे रेकाॕर्ड ठेवणारे व तारीख देणारे न्यायाधीशांचे मदतनीस. न्यायालयासाठी ही खूप महत्वाची व्यक्ती. थोड्याशा खालच्या पातळीवर साक्षीदारासाठी एक कठडा व बाजूला वकीलांसाठी जागा असते. याच खोलीत न्यायाधीशांसाठी वेगळा कक्ष ही असतो, तिथे मा. न्यायाधीश विश्रांती घेऊ शकतात किंवा कामकाजही करु शकतात.. चित्रपटात जसं एकदम चकाचक व पाॕश कोर्ट दाखवतात तसं इथे काहीच नसतं. खूपच साधेपणा  इथे दिसतो. पण खिडक्या खूप मोठ्या व भरपूर झाडे, दगडी भिंती यामुळे उजेड व वारा मात्र चांगला आहे. न्यायालयात मोबाईलला बंदी आहे, म्हणजे  तो वाजलेला अजिबात चालत नाही. जर चुकून वाजलाच  तर जप्त केला जातो.  एका प्रकरणाचा निकाल लागायला साधारण ४ ते ५ वर्ष लागतात. आपण खूप सहजपणे  या विलंबाबद्दल  टिका करत असतो,  स्वतः मी सुध्दा करायचे . या संदर्भात  एका चित्रपटातील तारीख पे तारीख..तारीख पे तारीख हा  संवाद खूप प्रसिध्द आहे.पण न्यायालयाचा १० वर्षाहून जास्त अनुभव  घेतल्यावर यामागचं कारण माझ्या लक्षात आलं. एक मा. न्यायाधीश रोज कमीतकमी ७० ते ८० प्रकरणं ( कदाचित यापेक्षाही जास्त ) हाताळत असतात, वकीलांचे  युक्तीवाद ऐकत असतात. यावरुन त्यांच्यावर किती  ताण असेल याची कल्पनाच केलेली बरी. न्यायालयात गेल्यावर इकडे तिकडे काळ्या कोटातील वकीलच वकील या न्यायालयातून त्या न्यायालयात जाताना दिसतात.एका वेळी अनेक प्रकरणं हाताळत असल्याने त्यांची धावपळ चाललेली दिसते. फौजदारी कोर्टाची इमारतही तिथेच असल्याने  अनेक वेळा मी पोलीसांना हातकड्या लावलेल्या कैद्यांना  सुनावणीसाठी घेऊन  जाताना पाहीलेलं आहे. सुरवातीला मला फार उत्सुकता असायची त्यांना पाहण्याची पण नंतर नंतर त्याची पण सवय होऊन गेली. कैद्यांना  न्यायालयातच भेटायला त्यांचे नातेवाईक ताटकळलेले असायचे. ते पाहून अनेक वेळा त्यांच्याशी बोलावे असे मला वाटायचे. न्यायालयाची वेळ ११ ते ५ असते. कित्येक वेळा वकीलांचा युक्तीवाद दोन दोन तास चालतो . एका वेळेस इतकी प्रकरणं हाताळताना, युक्तीवाद ऐकताना मा. न्यायाधीशांवर किती ताण येत असेल याची कल्पना यायला हरकत नाही. आपली न्यायव्यवस्था इतक्या ताणातही चांगलं काम करतीये याचा खरंच खूप अभिमान वाटतो.

काही वर्षांपूर्वी आमच्या घरात एक चोरी झाली. खिडकीचे गज वाकवून , गोदरेजचं कपाट फोडून घरातले सोन्याचे दागीने चोरीला गेले.भर दिवसा ही चोरी झाली. आम्ही कोणीच घरात नव्हतो. त्यावेळी  नाइलाजाने पोलीस चौकीत जायचा प्रसंग आला. पोलीसांबद्दल खूप नकारात्मक गोष्टी आपल्या कानावर येत असतात , चित्रपटांमधेही तसंच दाखवलं जातं. तिथे जाताना याच सगळ्या गोष्टी डोक्यात होत्या. पण आम्हाला आलेला अनुभव खूपच चांगला होता. आत शिरल्या शिरल्या पोलीसांनी  व्यवस्थीत बसवून चौकशी केली व तातडीने  ते आमच्याबरोबर घरी आले. चोरीच्या पध्दतीवरुन त्यांना चोरी कोणी केली असेल याचा अंदाज आला. त्यांच्या सतर्कतेमुळे चोर केवळ १० दिवसात पकडला गेला .पण दरम्यानच्या काळात  ते आमच्या मोबाईलवर जे काही updates असतील ते सतत  कळवत होते, आम्ही काही चौकशी केली तर व्यवस्थीत उत्तरे देत होते. केवळ त्यांच्यामुळेच चोरी गेलेल्या सोन्यापैकी काही सोनं आम्हाला परत मिळू शकलं आणि  पोलीसांबद्दलचं आमचं मत बदललं.    पण या काळात  लोकांचा मात्र खूप वेगळाच अनुभव आम्हाला आला.  त्यांच्या दृष्टीने सोनं चोरीला गेलं याला जबाबदार मीच (स्त्री म्हणून)ठरले.  सोनं कशाला घरात ठेवलं, इतकं सोनं कोणी घरात ठेवतं का, माझं घरात लक्ष नाही, घरातल्या लाॕकरमधे का नाही ठेवलं( लाॕकरमधूनच चोरीला गेलं),  तर काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे  तर  सोनं चोरीला गेलंच नाहीये, खोटं बोलताहेत हे लोक🤔. अर्थातच अशा बोलण्याकडे लक्ष देण्यात काहीच अर्थ नसतो.

न्यायालय आणि पोलीस चौकी या दोनही ठिकाणचा आमचा अनुभव नक्कीच आम्हाला खूप काही शिकवून गेलाय यात काही शंकाच नाही. मला वाटतं अशा ठिकाणी जायची वेळच फारशी आपल्यावर येत नाही किंवा  खूप कमी वेळा तिथे जावे लागते  म्हणून मग आपण कोणाच्या तरी ऐकीव अनुभवांवरुन आपले मत बनवतो  व अशा पूर्वग्रहांनी  त्यांच्याकडे पाहतो, प्रत्यक्षात तसं नेहमीच असतं असं काही नाही, नाही का.

® अंजली विश्राम



शनिवार, ७ मार्च, २०२०

# माझ्यासाठी _ ती


                               # माझ्यासाठी _ ती

‘ ती’चा जन्म झाला आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. ती वाढत होती , तिच्याबरोबर मीही मोठी होत होते .तिच्या  वयाचा प्रत्येक टप्पा मी तिच्या बरोबरीने , तिच्याएवढ्याच उत्साहाने अनुभवलाय. कधी तिची जिद्द पाहून चक्रावून गेलीये, कधी तिच्यातला धीटपणा पाहून आश्चर्यचकित झालीये. कधीकधी तिच्यातली सकारात्मकता, खंबीरपणा मला स्तिमीत करतो, तिची जगाकडे पाहण्याची दृष्टी पाहून मी अचंभीत होते.  ती आली, तिला पाहीलं, तिने जिंकलं.....

‘ती ‘ माझ्या कुशीत आली तो दिवस कसा विसरता येईल?. गोरा गुलाबी रंग, टपोरे डोळे, गुबगुबीत पण डोक्यावर मात्र फक्त मोजून चार केस.या केसांमुळे मी काळजीतच पडले. ती हळूहळू मोठी होत होती.सगळ्या घराची लाडकी बनली.  आता तिच्यापेक्षा फक्त चार वर्षांनी मोठ्या असलेल्या माझ्या मुलाला मला जपायचं होतः. या दोघांच्या जन्माच्या आधी मी खूप अबोल होते.  माहेरी असताना एका चौकटीत जगायची सवय झाली होती. कोणाशी काय बोलायचे ते मला उमजायचेच नाही.   घरात कोणी पाहुणे आले तर मी गप्प गप्पच असायची . त्याच्या मागचं कारण वेगळंच होतं पण लोकांना वाटायचं ही खूप शिष्ठ आहे.  पण ‘ ती ‘ आली आणि तिच्याशी खूप बोबडं बोबडं  बोलायला लागले . तिला गोष्टी खूप आवडायच्या, गाणी आवडायची. मग तिला खूप गोष्टी सांगायचे, बडबडगीतं म्हणून दाखवायचे. तिला ते खूप आवडायचे. तिच्याबरोबर असताना मी फक्त आईच असायचे, तिथे मला कुणी जज करायला नव्हते. तिच्यासाठी ‘मी’ खास होते . माझा आवाज चांगला आहे, मला गाणी चांगली म्हणता येतात, आवडतात हे त्या वेळी जाणवले. तिच्याशी बोलताना, गाणं म्हणताना, गोष्टी सांगताना मग मी हळूहळू मोकळी होत गेले, व्यक्त व्हायला शिकले.
‘ती’ आता मोठी होत होती. तिच्या शाळा प्रवेशाची वेळ आली. ज्या शाळेत प्रवेश घ्यायचा होता तिथे पालकांनी गीतेचा सोळावा अध्याय म्हणून दाखवायचा होता. तरच प्रवेश मिळणार होता. मला पाठ करता येईल? एवढा मोठा अध्याय लक्षात राहील? सगळ्यांसमोर म्हणुन दाखवता येईल? अनेक शंका मनात आल्या. पण आश्चर्य म्हणजे  अगदी थोड्याच दिवसात अध्याय पाठ करुन पहिल्याच दिवशी मी चक्क सगळ्यांसमोर म्हणुन दाखवला आणि  तिचा प्रवेश निश्चित झाला.  विश्वासच बसेना कारण स्वतःला खूप कमी लेखायची सवय होती मला. पण आपली स्मरणशक्ती इतकी पण कमजोर नाहीये याची मला जाणीव झाली, आत्मविश्वास वाढला.
पुढे तिची बालवाडीची शाळा सुरु झाली. ती जात्याच खूप धीट आहे याचं मला भारी कौतुक वाटायचं. आपल्यासारखी घाबरट होऊ नये म्हणून मी तिला प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला लावायची. ती पण प्रत्येक स्पर्धेत उत्साहाने न घाबरता भाग घ्यायची, यश मिळवायची.  पण प्रत्येक स्पर्धेत काहीतरी वेगळेपण हवं म्हणून खूप  वेगवेगळ्या कल्पना मला लढवाव्या लागल्या, त्यावेळी आपल्याला सृजनशीलतेचीही आवड आहे याचा शोध लागला. तिला शाळेत सोडायला जायच्या निमीत्ताने मलाही अनेक जीवाभावाच्या सख्या मिळाल्या. अबोल असल्याने कमी मैत्रीणी असणारी मी  सुध्दा तिच्याबरोबर वाढत होते, खुलत होते.
आता थोडीथोडी ‘ती’ मोठी व्हायला लागली. शाळेत कधी कमी मार्क्स मिळायचे, कधी मैत्रीणींशी भांडणं व्हायची. कधी तिला शाबासकी मिळायची तर कधीकधी तिला शिक्षकांचाही राग यायचा. कधी आनंदी असायची, कधी रागावलेली, कधी दुःखी. शाळेतून आल्या आल्या हे सगळं तिला सांगायचं असायचं. हे तिचं मोकळं होणं खूप आवडायचं मला. तिला शिक्षकांचा राग आला तर मलाही यायचा. या तिच्या भावनांना काबुत कसं ठेवायचं हे तिला शिकवायला लागायचं पण मी ही ते तिच्याबरोबर शिकतच होते. माझंच लहानपण मी तिच्यात बघत होते.
आता तरुण होत चालली होती ‘ ती ‘. तिचे विचार स्वतंत्र होऊ लागले. आतापर्यंत छोट्यामोठ्या गोष्टींसाठी माझ्यावर अवलंबून असणारी ‘ती’ पण  माझ्यावरचं तिचं अवलंबून असणं कमी व्हायला लागलं. माझ्यासाठी हा काळ खूप अवघड होता. आता तिला खुले आकाश मिळाल्यासारखं वाटत होतं.  मित्रमैत्रीणींची संख्या, तिचं बाहेर राहणं वाढायला लागलं. आमच्यामधे वाद नित्यनेमाचे व्हायला लागले. तिला माझी कुठलीच गोष्ट पटेनाशी झाली. तिच्यावर या काळात अनेक संकटाचे प्रसंग आले पण तिने ते  माझ्यापर्यंत येऊच दिले नाहीत,तिच्या पातळीवरच तिने हिंमतीने सोडवले. पण स्वभावतः खूप भावनाप्रधान असल्याने त्याचा तिला खूप त्रास व्हायचा.  प्रेम, मत्सर,राग,आनंद, भिती किती भावना सांगु? तिच्याबरोबर या भावनांच्या हिंदोळ्यावर झुलताना  मी ही त्यांना काबुत ठेवायला शिकले. भावनेच्या भरात अनेकवेळा चुकीचे निर्णयही तिने घेतले. कोणी एवढंसं काही बोललं तरी दुखावली जायची. अशा वेळी तिला सावरणं हे मोठ्ठं कौशल्याचं काम असायचं. कधी तिच्या कलाने घेऊन कधी रागावून पण माझी भावनाप्रधानता बाजूला ठेवून मला खंबीर व्हावे लागायचे. तिला सावरता सावरता  या सर्व काळात मी कधी खंबीर झाले ते मला कळलेच नाही.
 या पुढची पाच वर्ष तर तिच्यासाठी परीक्षा घेणारी ठरली. मी नक्की कुठे उभी आहे, माझ्या क्षमता नक्की कुठल्या आहेत, मला पुढे काय करायचंय या भावनिक गोंधळात ती अडकली.  त्या भरात करीअरमधला एक चुकीचा निर्णय घेतला गेला.  त्यामुळे तिचं खूप नुकसानही झालं, वेळही वाया गेला.या सगळ्यातून बाहेर पडतानाचा तिचा लढा मला खूप काही शिकवून गेला. या काळातली तिची धडपड,धावपळ, स्वावलंबन याचबरोबर  तिचा खंबीरपणा, ठामपणा, धीटाई मी नव्याने अनुभवली, तिचं खूप कौतुकही वाटलं.  मुळात कमकुवत असलेली मी तिच्याकडून खूप काही शिकत गेले.
काही काळातच तिला तिचा रस्ता सापडला.नव्या उत्साहाने  त्यावरचा तिचा प्रवास सुरु झाला. आता ती थोडीशी शांत झाली, पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं म्हणजे तिच्या आवडीचं क्षेत्र तिला मिळालं होतं. ती आता बहरत चालली होती, खुलली होती.  शंभर टक्के यशस्वी होत तिची वाटचाल सुरु होती. याच काळात अनेक वेळा अन्यायाविरुध्द लढण्याचा तिचा स्वभाव मला प्रकर्षाने जाणवला. मुलगा मुलगी यांच्यात केलेला फरक तिला आवडत नाही.  यासाठी तर तिने काॕलेजमधे, घरातही लढा दिलाय. कित्येकवेळा ती मलाही उशीरा घरी येणे, कपडे घालणे,बाहेर जाणे यामधे मी तिचा भाऊ आणि ती यात करत असलेला भेदभाव दाखवून देत असते. मी ज्या वातावरणात वाढले  त्याप्रमाणे माझ्यासमोर मुलगा व मुलगी यांच्या वागण्यासाठी काही विशीष्ठ नियम होते पण तिने हळूहळू ते मला दाखवून दिले, मला यातून बाहेर पडायला मदत केली. ती जशी मोठी झाली तशा आमच्या भुमिका बदलल्या. एका वेगळ्या खुल्या जगात ती वावरत असल्याने तिचे विचार खूप खुले, मुक्त व ठाम आहेत पण तितकेच ती दुसर्यांचे विचार ऐकायलाही शिकलीये.  आता ती मला शिकवते..आई होऊन. मुलं मोठी झाल्यावर, वयाच्या पंचेचाळीशीत मानसशास्त्रात  M.A.  करायचं होतं पण मला जमेल का, माझ्या लक्षात राहील का अभ्यास, करु की नको या दोलायमान अवस्थेत असताना तिनेच मला विश्वास दिला, माझा आत्मविश्वास वाढवला की तु हे नक्की करु शकशील. त्या बळावरच मी ते करु शकले. त्या काळात मी नसताना तिने सगळं घर सांभाळलं, आजीची काळजी घेतली. एक वेगळीच ‘ती’ माझ्यासमोर आली.
आज आमचं नातं मित्रत्वाचं आहे. माझ्या चुकाही ती मला मोकळेपणाने समजावून सांगते.
मागे वळून पाहताना तिच्या जन्मापासून आजपर्यंत माझ्यामधेही आमुलाग्र बदल झालाय. माझ्याबरोबरच  तिनेही मला  माझ्या  प्रवासात  साथ दिलीये. तिच्या खंबीरपणामुळे मी हळूहळू खंबीर होत गेले. कुठलाही निर्णय घेताना ती गोंधळून जात नाही, ठाम असते. मीही तसं व्हायचा प्रयत्न करते. ती खूप सच्ची आहे, मित्रमैत्रीणींसाठी  काहीही करायला तयार असते. अन्यायाला कायम प्रतिकार करते अगदी समोर कोणीही असो, ती खूप स्पष्टवक्ती आहे, जे मनात ते ओठात, हे सगळं तिच्याकडून शिकायचा मी प्रयत्न मी करत असते.  ती माझी लेक...माझ्यासाठी माझी प्रेरणा, माझं आयुष्य, माझं अस्तित्वच नाही, माझा अंश असलेली ‘ ती, माझी लेक मिताली...अर्थाप्रमाणेच उदार, सक्षम आणि मैत्रीपूर्ण.....