Shabdanjali......शब्दांजली

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

पावसाला पत्र

प्रिय वरुण,
माझा सर्वात जवळचा मित्र आहेस तु.  आज ' मैत्रीदिन '. मग तुझी आठवण झाल्याशिवाय, तुझ्याशी बोलल्याशिवाय हा दिवस कसा साजरा होणार?  दहावीपर्यंत मुलींच्या शाळेत जात असल्याने 'मित्र' हा शब्दही उच्चारायची बंदी होती. मग कळायला लागल्यापासून मनातल्या मनात तुझ्याशी मैत्रीचं नातं जोडून टाकलं.

दर वर्षी भेटायला येतोस तु. मला आठवतंय सुरवाती सुरवातीला तर बरोब्बर ७ जून ला तु येणार म्हणजे येणारच. कधीच तारीख चुकवली नाहीस. पण आताशा फारच बेभरवशाचा झाला आहेस. तारीख तर चुकवतोसच पण  खूप वाट पहायला लावतोस, कधी येतच नाहीस तर कधी खूप जास्त येतोस. काय झालंय तुला? का असं वागतो आहेस? खरं सांगू का मी खूप नाराज आहे तुझ्यावर.  मग म्हणलं तुला पत्रं लिहून नाराजी कळवावी. म्हणून हा पत्रप्रपंच.
तुझं आधीचं येणं मला आठवतंय. लहान होते तेव्हा मी. तु यायच्या आधीचं वातावरण खू आवडायचं मला, अजूनही आवडतं.माझ्या घराला ना मोठी गॕलरी होती.त्या गॕलरीत उभं राहून तुझं कोसळणं बघायला मजा यायची. लोकांची धावपळ, त्यांच्या छत्र्या, रेनकोट हे सगळं स्वतः न भिजता पहायला काय धमाल यायची. रस्त्यावरून छोटे छोटे ओहोळ वहायला लागायचे. आम्ही कागदाच्या नावा करुन त्यात सोडायचो  आणि पळत पळत गॕलरीत येउन नाव कुठपर्यंत गेलीये हे पाहत बसायचो. खरंच तुझ्या येण्याने खूप आनंद दिलाहेस तु आम्हाला कायमच. मग आताच काय झालंय तुला? आत्ताआत्तापर्यंत जूनमधे यायचा शिरस्ता कधीच मोडला नाहीस. आता तर जून  उलटून जुलैचा मध्य आला तरी तुझी चातकासारखी वाट पहावी लागते. मला माहीतीये तुझं उत्तर .याला कारण आम्हीच आहोत, हो ना? खरंच आहे रे मित्रा, कबूलच करते मी.तुझं पाणी ज्या नदीत मिसळतं ना  त्याचं पात्रंच कमी करुन टाकलंय आम्ही इमारतींसाठी, समुद्र हटवून बाँधकामं करतोय, जंगलच्या जंगल उध्वस्तं करतोय, पर्यावरणाचा ह्रास होतोय, डोंगर फोडतोय, पाणी अडवत नाहीये, पाण्याचा अपव्यय चाललाय, हे सगळं पाहून खूप मनस्ताप होतो तुला आणि मग संतापून तु एकतर येतच नाहीस किंवा खूप जास्त वेळा येतोस, बरोबर म्हणतीये ना मी? पण आम्हांला आता हे समजायला लागलंय. तुझा राग काढण्याचा खूप प्रयत्न करतोय आम्ही, बघतोयस ना? वृक्षारोपण करतोय, पाणी अडवतोय, जिरवतोय, पर्यावरण वाचवायचा प्रयत्न करतोय. आता तरी राग सोड ना रे. माझा जवळचा मित्र रागावला तर मलाआवडेल का सांग बरं? तुझ्या रागामुळे सर्वांचं किती नुकसान होतंय कळतंय का तुला? तु आला नाहीस तर दुष्काळ . माणसं, गुरंढोरं पटापट मरताहेत, शेतकरी बिचारे आत्महत्या करताहेत, जास्तं वेळा आलास तर जित्राबं वाहून चाललीयेत, माणसं, घरंदारं पुरात बुडताहेत, रोगराई पसरलीये. किती अंत पाहणारेस. आता तरी राग सोड . आम्ही या चुका परत करणार नाही, promise करते तुला. आम्ही सगळे तुझी मनापासून माफी मागतो. करशील ना माफ?

 आज मैत्रीदिनाच्या निमीत्ताने हक्काने तुझ्याकडे मागणं मागते जवळची मैत्रीण म्हणून, नाही म्हणू नकोस. आता नेहमीसारखा राग सोडून नियमीत भेटायला  येत जा...७ जूनला.चालेल?

तुझीच मैत्रीण ,
अंजली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा