Shabdanjali......शब्दांजली

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

देशासाठी मी काय करु शकते?

पुलवामा येथे आपल्या जवानांवर दहशतवादी हल्ला होऊन ६ दिवस उलटून गेले तरीही मनाची तगमग, कासाविशी, संताप कमी होत नाहीये. असा भ्याड हल्ला करुन , ४० च्यावर जीव घेऊन शेजारी देशाने काय साधले माहीत नाही पण माझ्यासारख्या लाखो सामान्य नागरीकांच्या मनात मात्र अनेक प्रश्न उभे राहीले आहेत. यातील कित्येक शहीद जवानांची वर्ष, दोन वर्षापूर्वी लग्न झाली आहेत, काहींवर त्यांच्या आईवडीलांची जबाबदारी आहे, काहींची मुलं लहान आहेत तर काहींची नुकतीच लग्न झाली आहेत.त्यांच्या कुटुंबांचा आक्रोश बघवत नाहीये.टेलीविजनवर दिसणारी दृश्यं डोळ्यासमोरुन जात नाहीयेत. अशा वेळी एक सामान्य नागरीक म्हणून मी काय करु शकते हा प्रश्न वारंवार मला सतावतोय. या परीस्थितीत प्रत्यक्ष तिथे जाउन तर मी काहीच करु शकत नाही ही हतबलता मला खूप अस्वस्थ करतीये.मग मी नक्की काय करायला हवं? या प्रश्नाचे उत्तर शोधायचा मी प्रयत्न केला आहे.तो मी मांडतीये. तुमच्याकडेही याचे उत्तर असेल तर जरुर सांगा. आपण सर्व जण मिळून या जवानांसाठी, आपल्या देशासाठी काहीतरी करु या. या घडीला नुसता संताप, बडबड नकोय तर कृती हवीये.......आपल्यासारख्या सामान्य नागरीकांकडून.
• शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांसाठी आर्थिक मदत आपण करु शकतो. अक्षयकुमार या सिनेअभिनेत्याच्या कल्पनेतून भारत सरकारने एक वेबसाईट तयार केली आहे. त्याद्वारे जवानांच्या खात्यात तुम्ही थेट रक्कम पाठवू शकता. या साईटचे नाव # bharatkeveer.gov.in असे आहे. कमीतक१०० रुपयेही पाठवू शकता.यामुळे incometax मधेही 80G खाली सुट मिळते. डेबीट कार्डद्वारे पैसे पाठवण्याची यात सोय आहे. Incometax साठी सर्टीफिकेटही लगेच मिळते. फुल ना फुलाच्या पाकळीची मदत करुन कुटुंबियांच्या दुःखावर छोटीशी फुंकर मारु यात.
• प्रत्यक्ष जरी आपण जाउन काही करु शकत नसलो तरी अनेक संस्था जवानांसाठी काम करत असताता, त्यांचे उपक्रम राबवत असतात. या उपक्रमांमधे आपण सहभागी होउ शकतो.  आपल्या परीसरातील संस्थांची माहिती गुगलवर मिळू शकते.
• जखमी झालेले अनेक सैनिक आर्मी हाॕस्पीटलमधे भरती झालेले असतात. त्यांना भेटायला जाउ शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांच्याबरोबर दिवाळी, राखी साजरे करु शकतो, त्यांना काही हवे असल्यास आणून देउ शकतो, गप्पा मारु शकतो, गरज असेल तर काही वाचून दाखवू शकतो.
• याशिवाय आज दहशतवाद आपल्या घराच्या उंबर्यापर्यंत येउन पोचलाय. सर्वांनी सजग राहणे, भाड्याने घर देताना काळजी घेणे, जागरुक राहून काही संशयास्पद आढळल्यास पोलीसांना कळवणे हे करणे गरजेचे आहे. आपले सैनिक युध्दात नाही तर दहशतवादामुळे शहीद झाले आहेत हे पाहीले की त्याचे गांभिर्य लक्षात येईल. एक नागरीक हा एक सैनिक असे झाले तर दहशतवाद्यांना काही करायची संधीच मिळणार नाही.
• सध्या सोशल मिडीयावर अनेक फोटो, बातम्या पहायला मिळतात. त्या बहुतेक करुन चुकीच्या , अतिरंजीत असतात. त्यावर विश्वास ठेवू नका, forward करु नका. त्याची शहानिशा करा. या अफवा पसरवण्यामागे बर्याचवेळा समाजकंटकही असू शकतात. आपण विश्वास ठेवून त्यांना मदत करतोय व indirectly आपल्या सैन्यासमोर संकट उभे करतोय कारण सिमेवरचा जवान एकसंध भारतासाठी लढतोय, जातपात, धर्म यासाठी आपसात लढणार्या लोकांसाठी नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
• आज अनेक चॕनल्सवर ‘experts’ ना बोलवून चर्चा चाललेली दिसते. पण अशा वेळी सरकारच्या मागे ठामपणे उभे राहणे व संयम बाळगणे हे सामान्य नागरीक म्हणून आपले कर्तव्य आहे.
• आपल्या आसपास कार्यरत असलेल्या सैनिकांचे कुटुंबिय रहात असेल तर त्यांना मदत करायला पाहीजे . त्याची गरज नसेल तर respect करणे, जाणीव ठेवणे की या घरातला माणूस आपल्यासाठी लढतोय हे तर आपण नक्कीच करु शकतो.
• मला असं वाटतं की सर्वोच्च मान हा जवानांना मिळाला पाहीजे. जसं एखादा सैनिक दिसला की उभे राहून मान देणे, सुट्टीवर आलेल्या सैनिकाँची काही सरकारी कामे असतील तर ती लाईनमधे उभे रहायला न लागता preference देउन ती कामे करणे किंवा परदेशात असतं तसं विमानातून जर प्रवास करत असतील तर ते जाहीर करुन टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करणे यासारख्या गोष्टी आपण करायला हव्यात.
• एक नागरीक म्हणून असलेली आपली कर्तव्य पार पाडून आपण एकप्रकारे देशसेवाच करणार आहोत.

चला तर मग सगळेजण मिळून या संकटाचा सामना करु.एकजुट होऊ या, जबाबदार नागरीक बनून,जातपात धर्म यांच्या भिंती तोडून, सगळे नियम पाळून , एकमेकांवर , देशावर, सैनिकांवर प्रेम दाखवू या ,  आदर करु या. आता वेळ आहे कृतीची ...एका सामान्य नागरीकाकडून

@अंजली जोगळेकर.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा