*नातं मैत्रीचं*
नवर्याच्या नोकरीमुळे तीन महिन्याच्या सचिनला घेउन ती मध्य प्रदेशातील कोरबा इथे गेली. पहिल्यांदाच पुणं सोडून आणि ते ही इतक्या लांब यामुळे खूप उदास झाली होती. काॕलनीत वेगवेगळ्या राज्यातून आलेले लोक रहात होते. तिची नाळ अजून कोणाशी जुळली नव्हती. त्यातच एकदा स्कुटरवरुन सचिनला घेउन जात असताना रात्रीच्या वेळी गाडीने स्कुटरला धडक दिली. सचिनला वाचवताना तिचे डोके दगडावर आपटले. ती रक्तबंबाळ झाली .हाॕस्पीटलमधे ठेवावे लागले, डोक्याला दहा टाके पडले. आता कसे होणार? माझ्या छोट्या सचिनला कोण पाहणार? आत्ता आई, बहीण इथे असायला हव्या होत्या असं वाटून तिच्या डोळ्यातून पाणी आले. पण या चार दिवसात गुजराथच्या जोशीभाभींनी ,खालापुरच्या अपर्णा आणि वर्ध्याच्या गांजापुरे वहिनींनी सचिनला सांभाळलं,फुलासारखं जपलं, तिची घरच्यांसारखी काळजी घेतली. ती घरी आली तेव्हा तिच्या चेहर्यावर हास्य फुललं होतं. परप्रांतात येउनही तिला प्रेमळ आई आणि बहिणी मिळाल्या होत्या..
(सत्य घटना माझ्या बाबतीत झालेली)
# *अलक ...मैत्री धर्मापलीकडची*
त्यानंतर अनेक वर्षांनी उत्तर प्रदेशात नवर्याची बदली झाली. तोवर अनेक ठिकाणी फिरुन झाले होते, बर्याच ठिकाणचे अनुभव घेतले होते म्हणजेच अनेक गावचे पाणी प्यायले होते. इथेही अनेक प्रकारची माणसे होती. विशेष कोणाशी मैत्री जुळली नव्हती. पण नवर्याचा फारुकी नावाचा मित्र एकदा त्याच्या बायकोला घेऊन आला. फरीहा नाव तिचं. दिसायला अत्यंत सुंदर.मला खूप आवडली. करावी का मैत्री हिच्याशी? कशी असेल ही? ती लखनौची. एकदा लखनौला गेलेलो असताना तिने आम्हाला जेवायला बोलवलं. तिच्या घरी जायला माझं मन साशंक होतं. आपल्या मनात अनेकदा पूर्वग्रह असतात, चुकीचे. पण तिने आमचं स्वागत जे काही आपलेपणानं केलं तेवढं तर जवळचे नातेवाईक पण करत नाहीत. तेव्हापासून आमचं नातं जुळलंय छान मैत्रीचं...धर्माच्याही पलीकडचं...आपलेपणाचं.
( दोन्ही घटना सत्य आहेत...आणि माझ्याशी संबंधीत आहेत )
©® अंजली जोगळेकर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा