Shabdanjali......शब्दांजली

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

आमची वारी

 आमची वारी :  आळंदी ते पुणे 


खरे तर मी आणि माझी खास मैर्त्रीण रेखा (पाठक) गेली ३ वर्ष म्हणत होतो कि एकदा तरी आळंदी पुणे वारीमध्ये चालत जायचे आणि वारीचा अनुभव घ्यायचा . पण एक तर रेखा गेली २ वर्ष चेन्नई ला होती त्यामुळे ते राहूनच गेले. यावेळी मात्र ठरवले कि जायचे नक्की . आणि अगदी त्याप्रमाणे सर्व योग जुळून आले. सकाळी ६ वाजता निघायचे ठरवले खरे पण त्या tention मुळे रात्री झोपच येईना .एवढे चालणे जमेल का , मधेच पाय दुखायला लागले तर काय,चक्कर आली तर काय अशा विचारांनी झोपच लागेना. शेवटी जेवढे जमेल तेवढे चालायचे नाहीतर मधेच वारी सोडून परत यायचे असे ठरवले.

सकाळी ६ वाजता घरून निघालो. आळंदीला पोचायला ७ वाजले .कुलकर्णी काका , वय ७४   आणि वारीचा १० वर्षांचा अनुभव , हे आमच्याबरोबर येणार होते. तरुणालाही लाजवेल असे उत्साही व्यक्तिमत्व .आमच्या दोघींच्या चेहरा पाहून त्यांनी आम्हाला धीर दिला , चालता येईल कि नाही  जमेल कि नाही हे सर्व विचार सोडून चालत राहा असा सल्ला दिला. परंतु तरी धाकधूक होतीच.

प्रत्यक्ष जेव्हा वारीच्या ठिकाणी पोचलो तेव्हा एकदम वेगळेच भारलेले असे वातावरण होते. जिथे पाहावे ठीथे कपाळाला गंध , बुक्का लावलेले वारकरी . त्यात महिला, पुरुष , मुले, वृद्ध असे सर्व जण होते. वारीला नुकतीच सुरवात झाली होती. प्रत्येक जण तल्लीन होऊन अभंग म्हणंत होते. ज्ञानबा तुकाराम ,ज्ञानोबा माउली असा जयघोष चालू होता. काका  दिंडी क्र. ४ चे सदस्य होते. त्याबद्दल त्यांनी माहिती दिली.पालखीच्या पुढे २८ आणि मागे २५० दिंड्या असतात. प्रत्येक दिंडीत ३५० ते ४०० वारकरी असतात. प्रत्येक दिंडीचा एक विणेकरी असतो. ज्याला आपण leader किंवा captain म्हणू शकतो . त्याच्या गळ्यात वीणा असते.त्याच्या शेजारी एका काठीवर उंच दिंडी क्र. लिहिलेला असतो जेणेकरून आपली दिंडी ओळखण्यास सोपी जावी.हे क्रमांक वारीचे सर्व नियम पाळणाऱ्या दिन्डीना पालखी समितीकडून दिले जातात.पालखीच्या मुक्कामी सकाळी  पावणेसहा वाजता आरती आणि अभिषेक होतो. यावेळी प्रत्येक दिंडीचा विणेकरी हजर असतो . त्यानंतर ६ ते ६.१५ च्या सुमारास पालखीचे प्रस्थान होते.प्रत्येक दिंडीत हरिपाठ, अभंग/ भारुडे म्हणली जातात.

या भारावून गेलेल्या वातावरणात आम्ही चालायला सुरवात केली. अनेकजण फक्त दरवर्षी वारीतच भेटत असतात. एकमेकांना माउली माउली असे एकमेकांना संबोधत मिठी मारत होते, नमस्कार करत होते, क्षेमकुशल विचारात होते. या भेटीत ना धर्म ना जातपात काही आड येत होते.काकानाही अनेक जण भेटत होते. सर्वानाच एकच ध्यास माउली आणि पंढरपूर .

चालायला सुरवात केली तेव्हा पालखीच्या मागे होतो. खूपच गर्दी होती. गर्दीत चालणे खूपच अवघड होत होते. आम्ही दोघींनी एकमेकींचा हाथ धरून ठेवला होता.त्या गर्दीत कोण नव्हते , आमच्यासारखे गॉगल, टोपी आणि बूट घातलेले सुशिक्षित, तर अनवाणी डोक्यावर हंडा तुळशी वृंदावन घेऊन जाणार्या स्त्रिया, पुरुष.पण एवढ्या गर्दीतही कधी असुरक्षित वाटले नाही. धक्काबुक्की नाही, शिव्या नाहीत    फक्त माउली आणि पांडुरंग. हे काहीतरी वेगळेच होते. जिथे पालखी थांबे तिथे दर्शन घ्यायला सर्वांची खूप धावपळ उडे. शेवटी आम्ही वाट काढत काढत २ तासांनी पालखीच्या पुढे गेलो .पुढे मात्र गर्दी थोडीशी कमी होती. व्यवस्थित चालता येत होते. आजूबाजूच्या गावातले लोक पालखीचे दर्शन घ्यायला दुतर्फा उभे होते.चालता चालता वारीविषयी खूप माहिती काका आणि त्यांचे मित्र यांच्याकडून मिळत होती. आपल्या भारतीय समाजात अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. त्यामुळे संपूर्ण भारतात राज्य /भाषा जरी बदलली तरी हि गोष्ट बदलत नाही.म्हणूनच लाखो वारकरी एखाद्या मुक्कामी गेले तरी उपाशी राहत नाहीत. त्या गावचे गावकरी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतातच. ते एक पुण्यकर्म समजले जाते.खरे तर वारीची सुरवातच सर्व समाजाने एकत्र यावे यासाठी केली गेली. त्या काळात तर याची खूप होती. वारीमध्ये जे अभंग म्हटले जातात त्यातून समाजाला काहीतरी शिकवले जाते.त्यांच्या चुकीच्याधी परंपरांवर  आसूड ओढले जातात.आपले संत साहित्य जात पात , धर्म भेद ,रूढी चालीरीती याच्या वर जाऊन जगायला शिकवते.तेच त्यांच्या अभंगातूनही समजावले जाते. वारकरी विसाव्याच्या वेळी अभंग/भारुडे म्हणतात.फुगड्या खेळतात . त्यामुळे त्यांना पुढे चालायची energy मिळते. वारीत चालताना पुढे उतार आहे. प्रत्येक वारकरी त्यावरून पळत सुटतो .मग तो म्हातारा असो कि तरुण. भारुडे/कीर्तने यामुळे त्यांना positive energy  मिळते.घाट चढताना सर्वजण हरिपाठ वाचायला/म्हणायला सुरवात करतात. वरून पाऊस पडत असतो पण घाट कधी पार होतो कळतच नाही.

हि सर्व माहिती घेत घेत चालत होतो. वाटेत एका ठिकाणी शाळेत थांबून खाली बसून सर्वांबरोबर वाटून नाश्ता केला. सुदैवाने हवा खूप चांगली होती. उन कमी आणि वारे सुटलेले त्यामुळे त्रास कमी झाला. खूप अनोळखी भागातून जात आम्ही विश्रांतवाडी ला  कधी पोचलो कळले पण नाही. तिथेच एका soceity च्या garrage मध्ये बसून जेवण घेतले.


या सर्व चांगल्या अनुभवांना गालबोट लागले ते मात्र अस्वच्छतेचे .प्रत्येक ठिकाणी वारकर्यांना बिस्किटे,केळी, जेवण असे वाटले जात होते. जिथे तिथे प्लास्टिकचे ग्लास , अन्नपदार्थ ,केळीची साले यांचा खच पडला होता. शिस्तबद्द्ध चाललेली वारी अशा वाटपाच्या ठिकाणी बेशिस्त होऊन जाई. प्रत्येक ठिकाणी एखाद्या पक्षातर्फे मंडप , त्यांचे नेते , त्यांच्यातर्फे वाटप या सर्वांचा उबग आला . काहीजण तर वारीत फक्त असे सामान गोल करतात आणि आपल्या गावी जाऊन विकतात असे कळले.खूप चांगली गोष्ट मला यात कळली कि वारीत मुसलमानांची पण एक दिंडी आहे.

हे सर्व करता करता शिवाजीनगर कधी आले ते कळलेच नाही.आम्ही २५ km चाललो एकूण असे कळले.

अर्थात या सर्वाचे श्रेय जाते रेखा आणि काकांना. केवळ त्यांच्यामुळेच आम्ही हि वारी करू शकलो यात काही शंकाच नाही. so thank you very much rekha and kaka and his friends.


अंजली जोगळेकर

25/6/2014

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा